﻿ईयो.
19.
नंतर ईयोबने उत्तर दिले आणि म्हणाला, 
“तुम्ही मला किती वेळ माझ्या जीवाला त्रास देणार आहात? आणि शब्दांनी मला मोडणार आहात? 
तुम्ही आतापर्यंत दहा वेळा माझा अपमान केला आहे. तुम्ही कठोरतेने माझ्याबरोबर वागता त्याची लाजही बाळगत नाही 
जर खरच मी काही चुक केली असेल तर, ती चुक माझी मला आहे. 
तुम्ही माझ्यापेक्षा चांगले आहात एवढेच तुम्हास दाखवायचे आहे, माझी संकटे माझ्या चुकीमुळेच निर्माण झाली आहेत असे तुम्ही (उगीचच) म्हणता. 
मग तुम्हास हे माहीती पाहिजे कि, देवानेच मला पकडण्यासाठी जाळे टाकले आहे. 
‘पाहा, असे मी ओरडतो कि मी चुकीचे केले आहे, पण कोणी ऐकले नाही. मी मदतीसाठी जोरात ओरडलो तरी न्याय मिळत नाही. 
मी पुढे जाऊ नये म्हणून देवाने माझ्या मार्गात अडथळा आणला. त्याने माझ्या मार्गावर अंधकार पाडला आहे. 
देवाने माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवली. आणि त्याने माझ्या डोक्यावरचा मुकुट काढून घेतला. 
माझा सर्वनाश होईपर्यंत देव मला चाऱ्ही बाजूंनी झोडपतो. एखादे झाड मुळासकट उपटून काढावे त्याप्रमाणे त्याने माझ्या आशा उपटून टाकल्या आहेत. 
त्याचा क्रोध मला जाळीत आहे, तो मला त्याचा एक शत्रू असे संबोधतो. 
त्याचे सैन्य माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवतो ते माझ्याभोवती मोर्चा उभारतात, आणि ते माझ्या डेऱ्याभोवती छावणी टाकतात. 
त्याने माझ्या भावांना माझ्यापासुन फार दूर केले आहे, माझ्या सर्वांना दूर ठेवण्याचा अनुभव त्याने मला दिला आहे. 
माझे नातलग मला सोडून गेले आहेत, माझ्या जवळचे मित्र मला विसरले आहेत. 
माझ्या घरी येणारे पाहुणे आणि माझ्या दासी मला परका आणि परदेशातला समजतात, मी त्यांच्या दृष्टीने उपरा झालो आहे. 
जरी मी माझ्या मुखाने याचना केली, माझ्या नोकराला बोलावले, तरी तो मला उत्तर देत नाही, 
माझी पत्नी माझ्या श्वासाचा तिरस्कार करते, माझे स्वतःचे भाऊ आणि बहिणी माझा तिरस्कार करतात. 
लहान मुलेदेखील मला चिडवतात, जेव्हा मी बोलायला जातो तेव्हा ते माझ्या विरूद्ध बोलतात. 
माझे जवळचे मित्रदेखील माझा तिरस्कार करतात. माझे ज्यांच्यावर प्रेम आहे ते लोक देखील माझ्याविरुध्द गेले आहेत. 
मी इतका कृश झालो आहे की माझी कातडी हाडांवर लोबंते, मी केवळ दाताच्या कातडीने बचावलो आहे. 
माझी दया येऊ द्या, मित्रांनो, तुम्हास माझी दया येऊ द्या! कारण देवाचा हात मजवर पडला आहे. 
तुम्ही माझा छळ असा करीत आहात जसे तुम्ही देव आहात. माझ्या देहाला सतत त्रास देण्याचा तुम्हास कंटाळा येत नाही का? 
अहो, मी जे बोलतो ते कुणीतरी लिहून ठेवावे! अहो, ते पुस्तकात नमुद करून ठेवायला हवेत. 
अहो, मी जे बोलतो ते लोखंडी कलमाने शिश्यावर किंवा पाषाणावर कोरुन कायम करायला हवे. 
माझा तारण करणारा जिवंत आहे याची मला खात्री आहे. आणि शेवटी तो या पृथ्वीतलावर येऊन उभा राहील. 
मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा आणि माझी कातडी नष्ट होईल तेव्हा सुध्दा मी देवाला पाहू शकेन. 
मी देवाला बघेन, तर मी स्वत:च त्यास पाहीन, माझे डोळे त्यास पाहतील, आणि ते परक्यासारखे राहणार नाही. माझा अतंरात्मा झुरत आहे. 
या सगळ्याचे मूळ माझ्याकडेच आढळून आले आहे, म्हणून याचा छळ कोणत्या प्रकारे करावा असे तुम्ही म्हणाल. 
तर तुम्हास तलवारीची भीती वाटायला हवी, कारण रागामुळे तलवारीने शासन होते, यावरुन तुम्हास कळेल की न्याय आहे.” 
